ठाणे मनपाकडून थकबाकी असलेल्या २६०६ नळ जोडण्या खंडित.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे (०१) : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडित केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत.
प्रभाग वसुली
माजिवडा मानपाडा : – १४,८६,४८,१४८
नौपाडा – कोपरी : – १०,२१,८९,३८९
वर्तकनगर : – ७,७५,१४,७९०
उथळसर : – ६,५२,६०,८३५
कळवा : – ०८,०८,१०,७६५
वागळे : – ४,०६,२२,५७०
लोकमान्य- सावरकर : – ०५,९५,२०,९०५
मुंब्रा : – ६,४७,३२,७७९
दिवा : – ०६,८४,२७,५१४
मुख्यालय-सीएफसी – ०७,२०,२८,५८५