दिवा शहरातील पाणी पुरवठा उद्या शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी ८ तास बंद राहणार..

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे (१३) : मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत निळजे येथून दिवा येथे प्रभाग क्र. २७ व २८ करीता ५०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहिनीवर उसरघर रेल्वे कल्व्हर्ट पलावा सिटी कंपाऊन्ड येथे मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्या अनुषंगाने मुख्य जलवाहिनीवर झालेली गळती थांबविणे अत्यावश्यक आहे, ही गळती थांबल्यावर दिवा प्रभाग समिती अंतर्गत आगासन, बेतेवडे, गणेश नगर, बेडेकर नगर, म्हसोबा नगर, शांती नगर, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव व दिवा पश्चिम आदी परिसरातील पाण्यासंबधित तक्रारी कमी होतील.
या मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्याकरीता दि. १४.०२.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं ६.०० या वेळेत ८ तासाकरीता दिवा शहरातील प्रभाग क्र.२७ व २८ करीता होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील ०१ ते ०२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.